सातारा जिल्ह्याला तिरंगामय करण्यासाठी ७५ हजार तिरंगे उपलब्ध; जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आवाहन
सातारा, दि. १२ (प्रतिनिधी) - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरांवर व व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला अनुसरून तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व मंडलांमध्ये प्रत्येक घर व व्यावसायिक आस्थापनांवर फडकविण्यासाठी पंच्याहत्तर हजार तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक रचना तेहेत्तीस मंडलांमध्ये विभागलेली असून प्रत्येक मंडल अध्यक्षांच्या घरी तिरंगा ध्वज पोहोचविण्यात आले आहेत. या ध्वजांचे घरोघरी वाटप सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा जिल्ह्याला तिरंगामय करण्याचे आवाहन करताना म्हटले की, “प्रत्येक घरी तिरंगा फडकवून आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सन्मानपूर्वक स्मरण करू या.”
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे, जिल्हा सरचिटणीस पैलवान धनंजय पाटील, नगरसेवक गणेश पवार, नगरसेवक महादेव पवार तसेच कोयना वसाहतीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Post a Comment